या लेखामध्ये आम्ही आपल्याला पित्तावर घरगुती उपाय कसे करायचे हे सांगणार आहोत. आज कालचे राहणीमान, जीवनशैली आणि खानपानात खूपच बदल झाले आहेत. घरगुती सात्विक आणि सकस आहाराची जागा कधी चमचमीत तिखट विदेशी पदार्थांनी घेतली हे आपल्याला देखील समजले नाही. विसाव्या शतकात अगदी बोटावर मोजण्याइतके चायनीजच्या गाडी आपण बघितली असतील! तेव्हा ही संस्कृती भारतामध्ये जास्त काळ टिकणार नाही हे आपण समजत होतो, मात्र दहा वर्षाच्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहार-विहारामध्ये बदल झाले की आपण आपला मूळचा आहारच विसरून गेलो आहोत!
पाश्चात्त्यिकरण व जागतिकीकरणामुळे भारताला अनेक विदेशी पदार्थांचा परिचय झाला. ज्यामध्ये अगदी सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीमध्ये चायनीज पदार्थांनी भारतीय बाजारपेठा काबिज केल्या आहेत!
चायनीज, मंचुरियन पदार्थांनी आपल्या रंगाने व चटपटीत, तिखट चवीने, सुगंधाने व अगदी झटपट बनवण्याच्या पद्धतींमुळे ,हे पदार्थ अगदी प्रत्येक घराघरात देखील बनवले जाऊ लागले आहेत. या रेसिपीजमध्ये वापरण्यात येणारे मसाले, वेगवेगळ्या चवींचे सॉस हे इतक्या तीव्र चवींचे असतात की आपल्या लोकांना अगदी चटकाच लागला आहे तसे पदार्थ खाण्याचा!! यामुळेच भारतात लठ्ठपणा आणि वजन वाढणे या समस्या देखील सामान्य झाल्या आहेत.
वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम भारतीय आहार : वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता
हा सगळा उहापोह एवढ्याच करता की, प्रत्येक दहा मधल्या सात लोकांना आता ऍसिडिटी पित्त व पोटासंबंधी समस्या भेडसावत आहेत. आपली शरीर प्रकृती आणि आपले आरोग्य हे आपण काय खातो यावर अवलंबून असते! पूर्वीच्या काळी असे म्हटले जायचे की व्यक्ती जो खातो जसे खातो तसेच वर्तन जगात वावरताना करत असतो किंवा सहाजिकच लोकांना म्हटले जायचे जास्त तिखट खाणारे लोक रागीट असतात!
आज आपण पित्ताबद्दल बोलणार आहोत. रोजच्या चयापचय क्रियेमध्ये आपण जे पदार्थ खात असतो त्या पदार्थांच्या पचनाचा वेग तसेच आपल्या शरीरांमध्ये अभिशोषण होण्याची गती यावर पदार्थ आपल्या शरीरासाठी किती योग्य व हानीकारक आहे हे अवलंबुन असते. आज अनेक डायटीशियन किंवा आहार तज्ञ आपल्या मुलाखती, व्याख्यान आणि लेखांमधून आपल्याला आहाराबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न करत असतात.
मानवी शरीराच्या आयुर्वेदानुसार तीन प्रकारच्या प्रकृत्ती आहेत, वात पित्त आणि कफ! या तीनही प्रकृती कमी जास्त प्रमाणामध्ये व्यक्तीमध्ये आढळतात, मात्र या तीनही प्रकृतीच्या लोकांना पित्ताचा त्रास जर झाला तर त्याचे परिणाम देखील कमी-अधिक प्रमाणात पाहायला मिळत असतात. आज काल आपण बऱ्याचशा स्त्री-पुरुषांना वयाच्या तीस- पस्तीशीतच सहजतेने म्हणताना बघतो की, मी अमुक खात नाही मला ऍसिडिटी होते किंवा काही खाल्ल्यामुळे ऍसिडीटी होते!
जेव्हा आपण आपले रोजचे जेवण घेतो तेव्हा त्या जेवणाचे आपल्या यकृतातील असलेल्या विविध पाचकरसांमुळे विघटन होऊन ऑक्सिडेशन होते ज्यामुळे ऊर्जा निर्माण होते व आपल्याला शारीरिक आणि बौद्धिक काम करण्यासाठी शक्ती प्रदान होते. एकच प्रकारचा आहार परत-परत खाल्ल्यामुळे आपल्या पोटातील हे पाचक रस आणि पाचन तंत्रामध्ये गडबड होते. एक तर हे पदार्थ सवयीचे होतात किंवा ह्या पदार्थांशिवाय दुसरा पदार्थ खाल्ला गेला तर मात्र पचनशक्तीवर विरोधी परिणाम होतो.
पोटातील ऍसिड खाल्लेल्या अन्नाला पचवून ऑक्सिडेशनची क्रिया करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये अन्नाचे ज्वलन होते व ऍसिड आणि गॅसेसची निर्मिती होते. ही रासायनिक प्रक्रिया रोज आपल्या नकळत पचनसंस्था अविरतपणे करत असते. मात्र गॅस्ट्रीक ग्रंथी व पचनसंस्थेमध्ये पाचक रस म्हणजेच ऍसिड अधिक प्रमाणात निर्माण करणारे पदार्थ खाल्ले गेले की ऑक्सिडेशनचा वेग अनाठायी वाढतो आणि उकळत्या तेलात पाणी पडावे असे पदार्थांचे बुडबुडे होऊन ऍसिड बनु लागते सोबत गॅसेस बनतात.
हे अधिकचे ऍसिड वाफेच्या रुपाने आपल्या पोटातून तोंडाच्या दिशेने उर्ध्वगामी येण्याचा प्रयत्न करतात यालाच आपण ॲसिडिटी रिफ्लक्स म्हणतो. आपल्या यकृतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ऍसिड असते की जर एखाद्या व्यक्तीचे यकृत रस्त्यावर ठेवुन फुटले तर रस्त्याला देखील खड्डे पडतील इतकी शक्ती या ऍसिडमध्ये असते!
(पित्तावर घरगुती उपाय) ऍसिडिटीची लक्षणे –
रुग्ण व्यक्तीला छातीमध्ये जळजळ होणे, छातीमध्ये चमक निघणे, घशात तिखट पाणी किंवा आंबट पाणी येणे, घशाची तीव्र जळजळ होणे, पोटामध्ये मोठ्या प्रमाणात गॅस होणे, पोट फुगून येणे, घशामध्ये पित्ताचे फोड येणे, आंबट करपट ढेकर येणे, वारंवार डोके दुखणे, पायाच्या पोटर्यांमध्ये गोळे चढणे, अंग दुखणे यासारखे त्रास होऊ लागतात. कधी कधी ऍसिडिटीमध्ये पोटातून येणाऱ्या चमका पूर्ण पोटभर फिरत छातीपर्यंत चढू लागतात, अशावेळी पेशंटला बसता, उठता, उभेही राहता येत नाही इतकी परिस्थिती बिकट होते.
डॉक्टरकडे आपली आरोग्याची तक्रार घेऊन गेल्यावर खाण्यापिण्याच्या पदार्थांवर पथ्यपाणी पाळावे लागते. खाण्यावर बंधने आल्यामुळे जीव मेटाकुटीला येतो. काही लोकांना पित्ताचा इतका जास्त त्रास होत असतो की साधी चपाती देखील त्यांना खाता येत नाही. ऍसिडीटीमुळे लोक बर्याचवेळा जेवण करण्याचे टाळतात, कारण काय तर पित्त वाढते म्हणून बऱ्याच लोकांना हे माहितीच नसते कि आपल्याच घरी मिळणारे काही पदार्थ आपण पित्तावर घरगुती उपाय म्हणून उपयोग करू शकतो !!
पित्तसमस्या होवूच नये म्हणुन घ्यावयाची खबरदारी –
१. खारवलेले, आंबवलेले, मसालेदार , तळलेले, बेकरीचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे ॲसिडिटी वाढते.
२. कोणत्याही एकाच पदार्थाचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यामुळे त्याचे विपरीत परिणाम शरीरावर होत असतात.
३. अनेक लोकांना लोणची, पापड, दररोज मसाल्याची भाजी, बेकरी पदार्थ, गोड पदार्थ आणि कधीही उठ-सूट बाहेर गाडीवर मिळणारे स्ट्रीट फुड्स व स्नॅक्स पदार्थ खाण्याची सवयच आपल्याला पित्ताचा त्रास होण्याला कारणीभूत होते.
४. रात्रीची जागरण केल्याने पचनसंस्थेवर भार येतो. रात्रीच्या जागरणामुळे देखील ऍसिडिटी वाढते.
५. दिवसाच्या दोन जेवनांमध्ये जास्त अंतर असू नये.त्यामुळे पित्त जास्त होते.
६. जास्त काळ उपाशी राहु नये. उपासमार करुन वजन कमी करण्याचा प्रयत्न अनेकजन करत असतात पण उपासमार केल्याने पित्त वाढते.
७. पित्तशामक पदार्थांचा आहारात समावेश करणे. जसे, फळांचा ज्युस, ताक, इत्यादी.
८. आठवड्यातून एक दिवस लंघन अवश्य करावे.
९. सकाळची न्याहारी न करता काही लोक ब्रंच करतात म्हणजेच एकदम खाऊन घेतात! न्याहारी ही नियमाने केलीच पाहिजे.
१०. दिवसातून अनेकवेळा चहा, कॉफीचे अतिप्रमाणात सेवन केल्याने देखील ऍसिडिटी वाढते.
११. उपाशीपोटी केवळ चहा पिऊन भुक मारण्याची सवय अनेक लोकांना असते.यामुळे देखील ऍसिडिटी वाढते.
१२. बैठकीचे काम-बसुन काम करणार्या लोकांना शारीरिक हालचाल जास्त नसल्याने अन्नपचनाचा वेग कमी होतो मात्र खाण्यावर नियंत्रण न ठेवल्यामुळे ऍसिडिटी जास्त होते.
१३. अपारंपारिक पदार्थांचे अतिसेवन, जास्त प्रमाणात अल्कोहोल सेवन,अतिधुम्रपानाची सवय या कारणांमुळे देखील ऍसिडिटी होते. गुटखा,तंबाखु या अमली पदार्थांच्या अतिसेवनाच्या सवयीमुळे आणि व्यसनामुळे ऍसिडिटी होते.
१४. जास्त वेळा शिळे व निकृष्ट झालेले अन्न खाणे. जेवनात भाज्यांना ऊठसुठ टेम्परिंग करणे म्हणजेच सारखा तडका मारुन भाज्या बनवणे, डाळी खाणे यामुळे देखील ऍसिडिटी वाढते.
१५. गरम पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच थंड पदार्थ खाण्याने देखील ऍसिडिटी होते. चहा पिऊन लगेच पाणी पिण्याची सवय आरोग्याला घातक ठरु शकते.
१६. मधल्या वेळात केवळ पॅकेज्ड फुड्स जसे चिप्स कुरकुरे इ आणि फास्ट फुड्स जसे बर्गर,पिझ्झा इ.असे पदार्थ कायमच खाण्याची सवय देखील ऍसिडिटी वाढते.
या सवयी बदलल्या तर पित्ताचा त्रास थांबेल!
पित्तावर घरगुती उपाय –
१. वेलची/ वेलदोडा –
ज्या व्यक्तीला पित्ताचा जास्त प्रमाणात त्रास होत असेल, ॲसिडिटीमुळे आपल्या छातीत जळजळ व ढेकर येत असतील तर अशा व्यक्तीने एक वेलदोडा तोडून तोंडामध्ये वेलचीचा 1-1 दाणा खाऊन संपूर्ण वेलदोडा संपवून टाकावा. हा प्रयोग दोन ते तीन दिवस करून पित्तावर घरगुती उपाय केला जाऊ शकतो.
२. तुळशीची पाने –
तुळशीचे पान ही पित्तावर अतिशय गुणकारी औषधी आहे. ॲसिडिटी झाल्यावर तुळशीची दोन ते तीन पाने तोडून केवळ चावून-चावून खाल्ली पाहिजे व तुळशीच्या रसाने पित्त शमते किंवा चार ते पाच तुळशीची पाने एक कप पाण्यामध्ये उकळून घ्यावी व हे पाणी उकळुन अर्ध्ये होईपर्यंत उकळुन त्याचा काढा बनवावा. या काढ्यामध्ये चवीकरता गूळ किंवा साखर टाकू शकता. हा काढा थंड झाल्यानंतर दोन दोन तासाच्या अंतराने दोन चमचे काढा प्यावा किंवा जेव्हा आपल्याला छातीमध्ये जळजळ किंवा ॲसिडिटी झाल्यासारखे वाटेल, तेव्हा दोन चमचे या काढ्याचे सेवन करावे यामुळे पित्तावर घरगुती उपाय केला जाऊ शकतो.
तुळशीच्या पानांचे अधिक फायदे जाणून घेण्यासाठी इथे जा : तुळशीचे फायदे आणि माहिती
३. थंड दूध –
थंड दूध पिल्यामुळे देखील पित्ताचा त्रास थांबतो. ज्या लोकांना पित्ताच्या त्रासामध्ये छातीत जळजळ होत असेल त्यांनी एक ग्लास थंड दूध पिण्यास हरकत नाही. थंड दूध प्यायल्यामुळे दुधामधील कॅल्शियम मुळे ऍसिडिटा वेग मंदावतो व पित्त शांत होते. ज्यामुळे रुग्णाला लगेच आराम मिळतो.
४. ताक –
ताक हे शीतल व शांत गुणांनी युक्त असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपली पचणयंत्रणा थोडीशी स्थूल होते, त्यामुळे काहीही खाल्ले तरी पचनाला खूप वेळ लागतो. याकरता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नित्यनियमाने दुपारच्या वेळी ताजे ताक प्यायला पाहिजे. ताकामधील लॅक्टिक ॲसिड पोटात होणार्या ॲसिड रिफ्लेक्स ला नियंत्रणात आणून नियमित करते. मसालेदार जेवन केले असेल किंवा अगदीच तड लागेपर्यंत जेवन केल्यामुळे पोट जड झाले असेल तर ताकामध्ये जिर्याची फोडणी देऊन ताक पिऊ शकता किंवा काळीमिरी पूड, जिरे पावडर व अोवा पावडर ताकात वरुन पेरुन थोडीशी कोथिंबीर टाकून आपण चवदार ताक पिऊ बनवून पिऊ शकता. ताक हे शितल गुणी असते ज्यामुळे ॲसिडिटीमधील जळजळ थांबते व पोटाला थंडावा मिळतो. आयुर्वेदामध्ये सर्व ऋतुंमध्ये ताकाचे सेवन लाभदायक सांगितले आहे.
५. केळी –
केळी देखील शीत गुणधर्माचे असते. तसेच केळी हे नैसर्गिक व प्राकृतिक अँटासिड मानले जाते. ॲसिडिटीच्या समस्येवर केळी खाल्ल्याने आराम मिळतो. केळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोटॅशियम असते, पोटॅशियम देखील असिडीटी रिफ्लेक्सला अाटोक्यात आणते. केळी ऍसिडिटीवर प्रभावीपणे काम करते. ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर आपण केळी कुस्करून खाली पाहिजे. यामुळे आपल्याला ॲसिडिटीच्या त्रासापासुन लगेच आराम मिळेल.
६. आले –
आले हे गुणांनी तीव्र, चवीला तिखट तीक्ष्ण वाटत असेल तरीही ॲसिडिटीवर एक प्रभावी औषध आहे. कोणत्याही प्रकारच्या ॲसिडिटीवर अर्धा इंच आल्याचा तुकडा किसून त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकावे व वरुन तीन-चार थेंब लिंबूरस पिळावा हे मिश्रण चांगले बारीक चावुन अगदी रस काढुन खावे. यानंतर 1 ग्लास कोमट पाणी प्यावे. सुरुवातीला जळजळ वाटली तरी अगदी पाच मिनिटांमध्ये आपल्याला ॲसिडिटी पासुन आराम मिळतो.
७. लिंबू –
ॲसिडिटी जर खूप जास्त प्रमाणामध्ये होत असेल तर यावर आपण लिंबाचा वापर नक्की करावा. लिंबू चिरून त्याचे दोन भाग करावे. लिंबाचा अर्धा भाग गॅसच्या बर्नरवर शिजवायला ठेवावा. त्यावर सैंधव मीठ टाकावे, हा लिंबू चांगला शिजल्यावर हा संपूर्ण लिंबू चोखून चाटून पूर्ण संपवा. यानंतर लगेच पाणी पिऊ नये. थोड्यावेळाने आपल्याला ॲसिडिटी मध्ये फरक जाणवेल.
८. बडीशेप –
बडीशेप देखील ॲसिडिटी वर प्रभावीपणे काम करते. बरेच लोक जेवणानंतर बडीशेप खातात. तसेच आपण हॉटेलमध्ये जेवण केले तर आपल्याला बडीशेप अॉफर केली जाते. त्याचा अर्थ असा असतो की जेवण कसेही असले तरी त्याला पचवण्याची क्षमता बडीशेपमध्ये असते! बडीशेप चावून खाल्ल्यावर पाचक रस तयार होतो ज्यामुळे अन्नपचनास मदत होते व ऍसिडिटी होत नाही. आजकाल अनेक प्रकारच्या सुगंधित बडीशेप पुड्यांमध्ये देखील विकत मिळतात. तसेच घरच्या घरी देखील आपण बडीशेप तुपावर खरपूस भाजून काचेच्या बरणीत भरुन ठेवुन दररोज जेवनानंतर एक चमचाभर बडीशेप खाऊ शकता. त्यामुळे जेवण पचण्यास सुलभ होते.
९. पानाचा विडा –
भारतीय संस्कृतीमध्ये अगदी परंपरेने जेवनानंतर खाल्ला जाणारा पानाचा विडा आजकाल लोक विसरत चालले आहेत. पानाचा विडा बनवण्याचे शेकडो प्रकार भारतामध्ये उपलब्ध आहेत. मीठा पान, मसाला पान, अगदी आयुर्वेदिक पानदेखील बनवले जातात. पान-सुपारी खाण्याची पद्धत भारतामध्ये पूर्वापार चालत आली आहे. नागवेलीची पाने, चुना आणि कात टाकून पारंपारिकरित्या पान बनवले जाते. या पानाने तोंड रंगतेच मात्र या पानांना खाऊन जो पाचकरस तयार होतो त्या रसामुळे पचन क्षमता सुधारते तसेच खाल्लेले अन्न लवकर पचते. ज्यामुळे ऍसिडिटीसारखी समस्या निर्माण होत नाही. आज-काल पानाचे अनेक नवनवे आविष्कार आणि प्रकार निर्माण होत आहेत मात्र पानाचा मूळ गुणधर्म अन्नपचनास मदत करणे हाच आहे.
१०. मुखवास –
मुखवास म्हणजे जेवण केल्यानंतर जे पदार्थ आपण खातो ज्यामुळे आपल्याला जेवणानंतर तोंडाचा दुर्गंध दूर होतो तसेच अन्न पचनासाठी देखील मदत होते. मुखवास अनेक प्रकारचे असतात. श्वासाची दुर्गंधी दूर करण्याबरोबरच पाचकरस निर्माण करण्याचे काम मुखवास करत असतात. आजकाल अनेक प्रकारचे व अनेक पद्धतीने बनवलेले नवनवीन मुखवास बाजारांमध्ये विकत मिळतात. भोपळ्याच्या बिया, बडीशेप, ओवा, सुंठ असे पदार्थ टाकून हा मुखवास घरच्या घरी देखील बनवता येऊ शकतो!
११. धना डाळ –
भारतीय संस्कृतीमध्ये जेवण झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी धनाडाळ खायला देतात, ज्यामध्ये धन्याच्या आतील बीज काढून तुपावर खमंग भाजलेले असते. धन्यामधील बीज हे पित्तशामक व पचन सुलभ करण्यासाठी उपयोगी असते. धनादाळ खाल्ल्याने देखील ॲसिडिटीच्या त्रासापासुन सुटका होते. जेवणानंतर नियमित धनाडाळ खाल्ल्यास जेवण लवकर पचते. काहीशी खारट तुरट चव असलेली धनाडाळ पचन यंत्रणेला कार्यक्षम ठेवण्यात चांगलीच मदत करते तसेच पित्तावर घरगुती उपाय देखील आहे.
१२. आवळा व आवळा सुपारी/आवळ्याचे पदार्थ –
पुरातन काळापासून आवळ्याचे महत्त्व आयुर्वेदामध्ये विशद केले आहे. आवळ्याचा रस सकाळी उपाशीपोटी घेतल्यास कधीही ॲसिडिटी व पोटासंबंधी कोणतीही समस्या निर्माण होत नाही. विटामिन सी चा उत्तम स्त्रोत असलेला आवळा हा चवीला तुरट, शीत गुणांनी युक्त व पाचक असतो. आवळ्यापासून अनेक प्रकारचे पचनक्रिया सुधारणारे पदार्थ बनवले जातात. आवळा सुपारी, आवळा कॅन्डी, आवळा ज्युस असे अनेक प्रकारचे पदार्थ आवळ्यापासून बनविलेले जातात. जेवनात नियमित आवळ्याचा मुरंबा खाल्ल्यावरदेखील आपल्याला जेवण पचण्यासाठी मदत होते. आवळ्यातील पाचक रस जेवणामध्ये मिसळून गॅस्ट्रिक ज्यूस तयार करतो, ज्यामुळे अन्न लवकर पचते व एनर्जी तयार होते. आवळा हा ॲसिडीटी रोखण्यासाठी एक उत्तम नैसर्गिक पर्याय मानला जातो. मळमळ-उलटी व ऍसिडिटीने होणारी डोकेदुखी या समस्यांमध्ये आवळा कॅन्डी किंवा आवळा सुपारी खाणे हितकारक असते.
संपूर्ण पाककृती वाचण्यासाठी इथे क्लिक करा :आवळा सुपारी संपूर्ण पाककृती