आयुर्वेदानुसार जे लोक योग्य पद्धतीने अन्न खातात ते निरोगी आणि तंदुरुस्त राहतात. आयुर्वेदानुसार जे लोक योग्य पद्धतीने अन्न खातात ते निरोगी आणि तंदुरुस्त राहतात. आयुर्वेदात सांगितले आहे की अन्न खाण्याची योग्य पद्धत, हे नियम तुम्हाला निरोगी ठेवतील
आजकालच्या व्यस्त जीवनात लोकांना त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेता येत नाही. चुकीचा आहार आणि बैठी जीवनशैली यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात.
म्हणूनच रोगांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी योग्य आहार खूप महत्वाचा आहे. आयुर्वेदानुसार शरीर निरोगी ठेवण्यासाठी शुद्ध आणि पौष्टिक अन्न खा. जेणेकरून शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळू शकतील.
ह्यासाठीच आयुर्वेदामध्ये अन्नाशी संबंधित काही नियम आहेत, ज्यांचं पालन केल्यास शरीराला अनेक आजारांपासून वाचवता येतं. पौष्टिक अन्न खाण्यासोबतच अन्न कसं खावं याचही भान असायला हवं.
चला जाणून घेऊया आयुर्वेदानुसार अन्न खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे.
ऋतूनुसार अन्न खा
आयुर्वेदानुसार अन्न नेहमी ऋतुमानानुसार खाल्लं पाहिजे. मोसमी अन्न खाल्ल्याने आरोग्य चांगलं राहतं आणि अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. आयुर्वेदानुसार उन्हाळ्यात हलके आणि सहज पचणारे अन्न खा. यासोबतच उन्हाळ्यात द्रवपदार्थ आणि थंड पदार्थ जास्त खा प्या. त्याचबरोबर हिवाळ्यात अशा गोष्टी जास्त प्रमाणात खाव्यात, ज्यामुळे शरीर उबदार राहतं. हिवाळ्यात शिळे आणि थंड पदार्थ खाणं टाळा.
जमिनीवर बसून जेवा
आयुर्वेदानुसार जमिनीवर बसून म्हणजे मांडी घालून जेवायला हवं. मांडी घालून बसल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होते, असे आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे शरीराला अन्नातील पोषक घटक मिळतात. तेव्हा नो टेबल हे काही लोकांसाठी नोटेबल आहे.
एकाच वेळी जास्त खाऊ नका
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत लोक अनेकदा सकाळचा नाश्ता सोडतात आणि नंतर दुपारच्या जेवणात एकत्र जास्त खातात. आयुर्वेदानुसार एकावेळी जास्त अन्न खाऊ नये. एकाच वेळी जास्त अन्न खाल्ल्याने पचनसंस्थेवर अधिक ताण पडतो आणि अन्न पचणे कठीण होते. आयुर्वेदानुसार नेहमी भूकेपेक्षा थोडे कमी अन्न खावे.
अन्न नीट चावून खा
काही लोक खूप भरभर खातात. पण, हा योग्य मार्ग नाही. आयुर्वेदानुसार अन्न नेहमी चर्वण करून म्हणजेच नीट बारीक चावून खावे. असं खाल्ल्याने अन्न लवकर आणि चांगले पचतं. अन्न नीट चघळल्याने शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये सुद्धा मिळतात.
जेवताना पाणी पिऊ नका
काही लोकांना जेवण करताना पाणी पिण्याची सवय असते. परंतु, आयुर्वेदानुसार अन्न खाताना पाणी पिऊ नये. यामुळे अन्न नीट पचत नाही, त्यामुळे खाल्लेलं पचायला जास्त वेळ लागतो. जेवताना पाणी प्यायल्याने पचनास त्रास होऊ शकतो. आयुर्वेदानुसार जेवण करण्यापूर्वी सुमारे 40 मिनिटे आणि जेवण झाल्यानंतर अर्धा तास पाणी प्यावे.
रात्रीच्या जेवणानंतर चाला
आयुर्वेदानुसार जेवण केल्यानंतर थोडावेळ चालले पाहिजे. जेवल्यानंतर लगेच पडून राहिल्याने किंवा एकाच जागी बसल्याने अन्नाचे पचन नीट होत नाही, ज्यामुळे वजन वाढतं आणि पचनाचे त्रास होतात.
तर मित्रांनो, निरोगी राहण्यासाठी, आपण आपला आहार योग्य ठेवला पाहिजे. तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. यासोबतच तुम्हाला अन्न खाण्याच्या योग्य पद्धतीबद्दलही माहिती असायला हवी. जर तुम्ही नीट खाल्लं नाही तर तुम्हाला अनेक आजार आणि त्रास उद्भवू शकतात. हे आजार टाळण्यासाठी आयुर्वेदात दिलेल्या ह्या नियमांचं पालन करा.