केसांना तेल लावल्यानंतर आपण अशा काही चुका करतो, ज्यामुळे केसांचं खूप नुकसान होतं आणि ते खराब होऊ लागतात. तेल लावल्यानंतर ह्या चुका करू नका, केस खराब होतील.
लांब दाट आणि मजबूत केस असावेत अशी इच्छा कोणाची नसते? पण, जेव्हा केसांना योग्य पोषण मिळत नाही, तेव्हा केसांशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात.
आजकाल वाढतं प्रदूषण आणि वाईट जीवनशैलीमुळे केस गळणे, कोंडा होणे, केस कोरडे होणे अशा अनेक समस्यांनी अनेकजण त्रस्त आहेत. केसांचे पोषण करण्यासाठी योग्य आहारासोबतच त्यांची योग्य काळजी घेणेही खूप गरजेचे आहे. केसांची काळजी म्हटलं की लगेच आपण केसांना तेल लावतो. पण त्याने त्रास अजून वाढतात. पण का?
केसांना तेल लावल्याने त्यांचे पोषण होते आणि केस निरोगी राहतात. पण अनेक वेळा केसांना तेल लावल्यानंतर आपण अशा काही चुका करतो, ज्यामुळे केसांना खूप नुकसान होते आणि ते खराब होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया केसांना तेल लावल्यानंतर कोणत्या चुका टाळाव्यात.
केस घट्ट बांधता का?
केसांना तेल लावल्यानंतर बरेच लोक केसांना अंबाडा किंवा पोनीटेलमध्ये घट्ट बांधतात. परंतु, यामुळे केसांवर ताण येतो आणि ते कमकुवत होऊन तुटतात. खरं तर, तेल लावल्यानंतर केसांमध्ये ओलावा असतो, ज्यामुळे ते खूप मऊ होतात. अशा स्थितीत केस घट्ट बांधल्याने ते तुटायला आणि गळायला लागतात. हे टाळण्यासाठी केसांना तेल लावल्यानंतर ते उघडे सोडा किंवा सैल पोनीटेल बनवा.
भरपूर तेल लावता का?
अनेकांना त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे केसांना तेल लावता येत नाही. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा त्यांना केसांना तेल लावण्याची वेळ मिळते तेव्हा ते एकाच वेळी भरपूर तेल लावतात.
पण थांबा. असं केल्याने केसांना फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. कारण केसांना जास्त तेल लावल्यानंतर ते काढण्यासाठी तुम्हाला जास्त शॅम्पू वापरावा लागेल. केसांना जास्त शॅम्पू लावल्याने केस कोरडे आणि निर्जीव होतात. हे टाळण्यासाठी केसांना एकाच वेळी जास्त तेल लावू नका.
तेल लावल्यानंतर लगेच विंचरता का?
अनेकजण तेल लावल्यानंतर लगेच केस विंचरतात. पण, असं करणं अजिबात योग्य नाही. केसांना तेल लावल्यानंतर ते असेच सोडावे. तेल लावल्यानंतर केस मऊ होतात. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही कंगवा करता तेव्हा केसांवर ताण येतो, त्यामुळे केस तुटायला आणि गळायला सुरूवात होते. केसांना तेल लावल्यानंतर हाताने केस विलग करा.
तेल लावल्यानंतर हेअर प्रॉडक्ट्स वापरता का?
केसांना तेल लावल्यानंतर हेअर मास्क किंवा इतर कोणतेही हेअर प्रोडक्ट वापरू नये. केसांना तेल लावल्यानंतर केमिकलयुक्त हेअर प्रोडक्ट लावल्याने केस खराब होतात. केसांना शॅम्पू केल्यानंतरच हेअर प्रोडक्ट वापरा.
तेल किती वेळ ठेवता
केसांना तेल लावल्यानंतर ते जास्त काळ ठेवू नयेत. कारण केसांना तेल लावल्यानंतर, ते बराच वेळ सोडल्यानंतर, केसांमध्ये धूळ आणि घाण साचू लागते. यामुळे केस खराब होतात आणि केस गळणे, कोंडा असे त्रास होतात.
केसांना निरोगी ठेवण्यासाठी तेल लावणं खूप गरजेचं आहे. पण केसांना तेल लावल्यानंतर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. केसांना तेल लावल्यानंतर ह्या चुका केल्याने केस खराब होऊ शकतात, त्यामुळे त्या टाळा.